मोर्शी (अमरावती) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश पोहोरे, विजय जावंधिया, देवेंद्र शर्मा यांनी जेलभरो आंदोलन करायचे ठरविले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने हे बिगरराजकीय आंदोलन उभे करण्यात आले आहे.
‘बिगरराजकीय आंदोलन उभे झाले, तर सरकारदेखील सहानुभूतीने विचार करू शकते. शेतकऱ्यांनी या सगळ्याचा विचार करावा आणि प्रस्तावित जेलभरो आंदोलनात लाखोच्या संख्येने सामील होऊन आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी किमान उत्पन्नाची ग्वाही देणारी एक कायमस्वरूपी व्यवस्था सरकारकडून मान्य करून घ्यावी,’ असे आवाहन पोहोरे यांनी केले आहे.
‘कर्जमाफीने प्रश्न सुटणार नाहीत. आजपर्यंत किमान पाच वेळा कर्जमाफी मिळूनही शेतकरी आत्महत्या होतच आहेत. त्यांचे आर्थिक प्रश्न कायमच आहेत, कारण त्यांच्या समस्यांचे मूळ कर्जामध्ये नसून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या व्यवस्थेत आहे. साठच्या दशकात शेतकरी सधन होता, श्रीमंत होता. आपल्याकडे शेती असल्याचा त्या वेळी लोकांना अभिमान वाटायचा. पोटासाठी कुणाची चाकरी करावी लागत नाही, ही अभिमानाची बाब समजली जायची आणि आता परिस्थिती एकदम उलट झाली आहे,’ असे पोहोरे म्हणाले.
‘शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कारण तो रस्त्यावर उतरत नाही. कधी रस्त्यावर उतरला तरी भलत्याच मागण्या समोर केल्या जातात. शेतकऱ्यांचे नेते त्यांची दिशाभूल करतात आणि त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावर उतरलेला शेतकरी शेवटी रस्त्यावरच राहतो. अशा परिस्थितीत आपल्या न्याय्य मागण्यांना वाचा फोडायची असेल तर गांधीजींच्या मार्गाने अहिंसक परंतु परिणामकारक आंदोलन शेतकऱ्यांना उभारावे लागेल. असे आंदोलन उभे करताना एक काळजी मात्र शेतकऱ्यांनी आवर्जून घ्यायला हवी आणि ती म्हणजे राजकीय मंडळींना अगदी खड्यासारखे दूर ठेवायला हवे. सरकारला नमविणारे आणि शांततामय आंदोलन म्हणून आम्ही ‘जेलभरो’ची कल्पना शेतकऱ्यांपुढे मांडली आहे. शेतकऱ्यांना यासाठी मार्गदर्शन करण्यास आम्ही तयार आहोत,’ असे पोहोरे यांनी सांगितले आहे.